वणी शहरात दररोज होते अवैध जड वाहतूक कारवाई शून्य…. शहरात रस्त्याच्या बाजूला उभे असतात जड वाहने व बंद असलेली वाहने यांच्यावर कारवाई होणार का ?
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वेळाबाई फाट्यावर अवैध जड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर गुरुवारी सायंकाळी आरटीओ, शिरपूर पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त वतीने रात्री ९ वाजेपर्यंत कारवाई सुरू होती. ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी सकाळी ११ वाजता सुरू झाली, मात्र रात्री ९ वाजले तरी कारवाई सुरुच होती. यावेळी ढाकोरी येथिल सरपंच अजय कवरासे, कुरईचे विजय झाडे, तुळशिराम बोबडे व गावकऱ्यांचे कारवाई करिता सहकार्य लाभले होते.

शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वेळाबाई मोहदा परिसरात अनेक खाणी आहे. या खाणी मधुन गीट्टी, डोलोमाईन, मुरुम अशा खनिजांची वाहतूक वाहनांमधून सुरू आहे. विशेष म्हणजे ज्या रस्त्यावरून सदरची सुरू वाहतूक सुरू आहे त्या रस्त्याची क्षमता ५५ टन वजनाची असताना सदर वाहनांमधून ७० टन वजनाची ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्याने शिरपूर – वेळाबाई- मोहदा रस्त्याचे बारा वाजले, जागोजागी खड्डे पडले आहे. गुरुवारी १८ जुलै ला सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सदर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते, वेळाबाई- मोहदा कडुन ओव्हरलोड वाहने येत असताना बांधकाम विभागाचे अभियंता सुहास ओचावार यांना दिसून आले, त्यांनी याबाबतची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांसह शिरपूर पोलिसांना दिली.

शिरपूर पोलिस घटनास्थळी पोहोचले, मात्र आरटीओ उशिरा पोहोचल्याने सकाळी ११ वाजताची कारवाई रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होती. यावेळी ५५ टन वजनाची क्षमता असताना ६८ ते ७० टन वजनाची ओव्हरलोड वाहतूक करताना १० ते १२ आयव्हा ट्रक वाहने आढळून आले होते. एका ओव्हरलोड आयव्हा ट्रक वर अंदाजे ४० ते ५० हजाराचा दंड वसूल करण्यात येणार असून कारवाई पूर्ण झाल्यानंतर कारवाईची पुर्ण माहिती देण्यात येईल असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किन्द्रे , शिरपूर चे ठाणेदार माधव शिंदे हे आपल्या पथकासह उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुहास ओचावार व त्यांचे सहकारी सुद्धा उशिरापर्यंत हजर होते.

वणी उपविभागामध्ये सर्वत्र अवैध जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते तसेच दररोज वणी शहरातून जड वाहने पोलिसांच्या डोळ्यासमोरून जातात. त्यांच्यावर वाहतूक पोलीस कोणतीच कारवाई करत नाही. जड वाहतुकीला सकाळी दहा ते सायंकाळी दहापर्यंत वणी शहरातून जाण्यासाठी बंदी आहे. मात्र दिवस भर 8, 10, 12, 16 चाकी जड पोलिसांच्या समोरून सुरू असते मात्र वाहतूक पोलीस जड वाहनावर कारवाई न करता दुचाकी धारकांवर कार्यवाही करण्यात व्यस्त असते. शहरातील सर्व रस्त्यांवर मोठ-मोठी वाहने उभी असतात, बंद असलेली वाहने उभी असतात, जेसीबी उभी असतात यांच्यावर कधीच कारवाई करत नाही, याचे कारण काय ? हा प्रश्न जनतेला नेहमी पडला असतो. हे सर्व वाहन पुढाऱ्यांचे व लोकप्रतिनिधी यांचे तर नाही, त्यांच्याकडून यांना चिरीमिरी मिळत तर नाही किंवा मोठ्यांचे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची यांच्यात हिंमत नाही असा प्रश्न नागरिक करीत आहे ?




