स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांमध्ये मूलभूत सुविधा न पुरविल्यामुळे सर्वसामान्यांचा शहरी भागाकडे कल वाढलेला आहे.

AM न्यूज वृत्तांकन, वणी
आपल्या देशात ग्रामीण भागामध्ये जवळजवळ ८५% नागरिक राहत होते. पण आजच्या स्थितीला महाराष्ट्रामध्ये ५० टक्के पेक्षा अधिक लोक ग्रामीण भागात राहत नाहीत. स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांमध्ये मूलभूत सुविधा न पुरविल्यामुळे सर्वसामान्यांचा शहरी भागाकडे कल वाढलेला आहे. खेडी बकाल झाली आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्यासाठी विकासाच्या काय सोयी, सुविधा पाहिजे . याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना सद्यस्थितीतील कालबाह्य कायद्यामुळे त्यांना नाही. हेच ग्रामीण समस्येचे मूळ आहे. असे प्रतिपादन चिंतनशील विचारवंत गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी केले.

विदर्भ साहित्य संघ व नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माझा गाव माझा वक्ता या व्याख्यानमालेचे ३६ वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ वणी चे उपाध्यक्ष गजानन कासावार हे होते.

“ग्रामीण महाराष्ट्र सद्यस्थिती व आव्हाने ” हा विषय मांडताना गज्जलवार पुढे म्हणाले की, भारतात ६ लाख खेडी आहेत. महात्मा गांधीजींच्या खेड्याकडे चला या संदेशाचा शब्द:श अर्थ घेवून स्वातंत्र्यानंतर शहरीकरणाला विरोध करण्यात आला तरी शहरीकरण झाले. पण खेडे स्वयंपूर्ण झाले नाही. ग्रामीण भागाच्या विकासासाठी निर्णय प्रक्रियेचे सगळ्यात जास्त अधिकार जिल्हा परिषदेजवळ एकवटले आहेत. त्यानंतर पंचायत समितीला अधिकार आहे. पण ज्या गावाचा विकास करायचा आहे. तेथील नागरिकांना त्यांना काय पाहिजे हे ठरविण्याचा अधिकार नसल्यामुळे खऱ्या अर्थाने ७५ वर्षानंतर ही ग्रामीण भागाचा दशा बदलली नाही.

आमचं गाव आमचं सरकार हे फक्त नावापुरताच आहे. हे भीषण वास्तव त्यांनी मांडले. ग्रामीण भागाचा बट्ट्याबोळ करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिनियम कारणीभूत आहेत. या कालबाह्य कायद्यामुळे सर्व समस्या निर्माण झाल्या. यासाठी प्रशासनात सुध्दा बदल होणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले.

या प्रसंगी पाहुण्यांचा परिचय गजानन भगत यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विदर्भ साहित्य संघ वणीचे कार्यक्रम प्रमुख राजाभाऊ पाथ्रडकर यांनी तर आभार प्रदर्शन सचिव अभिजित अणे यांनी केले.




