तक्रार कुठेही करा.. आमचं कोणी काही वाकड करत नाही… म्हणून मनमानी कारभार…
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
शहरात विकास कामे सुरू आहे, मात्र गरीब व सर्वसामान्य नागरिकांनी अतिक्रमण जर केले असेल तर त्यांना शासनाचे नियम लागतात. श्रीमंत नागरिकांनी व लोकप्रतिनिधींच्या दबावाने कोणतेच नियम लागत नाही आणि सर्व नियम बाजूला असतात. त्यामुळे नांदेपेरा रस्त्यावर रेल्वे गेट पर्यंत अनेक जणांचे अतिक्रमण आहे, ते अतिक्रमण न काढता त्यांना यात सवलत देऊन रस्ता नियमानुसार न बांधता श्रीमंतांसाठी रस्ता छोटा बांधत आहे. यामध्ये जनतेच्या पैशाचा दुरुपयोग होऊन लोकप्रतिनिधी व कंत्राटदार पैसा आपल्या खिशात घालत आहे. कोणत्याही अधिकाऱ्याकडे तक्रार करा काहीच होत नाही असे छाती ठोकून सांगतात. त्यामुळे त्यांचे काहीच वाकड होत नाही असे म्हणतात.
शहरात अनेक ठिकाणी नियमबाह्य व निकृष्ट भ्रष्टाचार असे कार्य सुरू असून विरोधक कोणत्या कामात व्यस्त आहे हा प्रश्न उपस्थित होतो आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा गट, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सर्व शांत का बसले आहेत, यांना होणारा भ्रष्टाचार दिसत नाही का ? की यांनी चिरीमिरी घेऊन शांत बसले. अशी चर्चा जनता करत आहे. आता जनता निकृष्ट व भ्रष्टाचारी काम करणाऱ्या लोकांना धडा शिकवतील का हा प्रश्न उपस्थित होतो आहे ?

शहरातील साई मंदिर ते नांदेपेरा रोड रेल्वे क्रॉसिंग पर्यंत सिमेंट रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्याचे काम कंत्राटदार आर.व्ही. उंबरकर कडून करण्यात येत आहे. तब्बल ६ कोटी रुपयांच्या या रस्त्याच्या निविदेतील मंजूर कामाला वगळून लोक प्रतिनिधीच्या मर्जीने काम सुरू आहे. विशेष म्हणजे अनेक तक्रारी नंतर ही सा. बा. विभाग व कंत्राटदार कोणालाही न जुमानता आपल्या मर्जीने काम करीत आहे.
सदर रस्त्याच्या मंजूर निविदेनुसार रस्त्याच्या मध्य १ मिटरचे डिव्हायडर व त्याच्या दोन्ही बाजू ने ७.५० मीटर सिमेंट रस्ता, २.५० मीटरचे पेव्हर ब्लॉक व १.५० मीटर रुंदीचे सिमेंट ड्रॅनेजसह एकूण २४ मीटर रुंदीचे बांधकाम करावयाचे आहे. मात्र साई मंदिर ते न. प. शाळा क्रमांक ५ पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने रस्त्याच्या हद्दीत अतिक्रमण करून अनेक पक्के घर, दुकाने व अपार्टमेंट बांधण्यात आले आहे. तर त्यापुढे अनेक जणांनी अतिक्रमण करून घराचे वाल कंपाऊंड बांधले आहे.

नांदेपेरा मार्ग हा आजच्या घडीला शहरात सर्वात जास्त रहदारीचा मार्ग झाला आहे. या मार्गावर शाळा, कॉलेज, दवाखाने असल्यामुळे दिवसभर रहदारी असते. तर रेल्वे फाटक बंद असताना वाहतूक कोंडी होते. अशातच कोट्यावधीच्या या रस्त्याच्या कामात बांधकाम विभाग, लोक प्रतिनिधी व कंत्राटदाराच्या संगनमताने मोठा गौडबंगाल होत आहे. सदर कामात सुरु अनियमितता बाबत शहरातील एका समाजसेवकाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.




