मारेगाव शहरातून होणार शेतकरी न्याय यात्रेला प्रारंभ…. आशिष खुलसंगे यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

वणी विधानसभा क्षेत्रात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष येणाऱ्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जनसंवाद शेतकरी न्याय यात्रेला आरंभ करणार आहे. ही यात्रा वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर,आदिवासी, महिला, युवक यांच्याशी संवाद साधणार आहे.

सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून त्या शासन दरबारी उचलून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या यात्रेद्वारे केला जाणार आहे. खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वामध्ये ही यात्रा होणार आहे. शेतकरी न्याय यात्रेचे मुख्य संयोजक झरी तालुका काँग्रेस व वसंत जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी चे अध्यक्ष आशिष खुलसंगे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष संध्या बोबडे महिला शहराध्यक्ष श्यामा तोटावार, तालुकाध्यक्ष वणी घनश्याम पावडे, शहर अध्यक्ष डॉक्टर महेंद्र लोढा, प्रभारी शहराध्यक्ष अशोक पांडे, मारेगाव तालुकाध्यक्ष मारुती गौरकार, विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस राहुल दांडेकर यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांच्या समावेशक ही यात्रा संपन्न होणार आहे.

शेतकरी न्यायात्रेच्या प्रमुख मागण्या : सरसकट 100% शेतकरी कर्जमाफी करावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतमालाला खर्चा नुरुप बाजार भाव व हमीभाव मिळावेत, हमीभावाला कायद्याचे रूप मिळावे. मारेगाव, झरी येथे तात्काळ बस स्थानक करावे, दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांवर आळा घालण्यासाठी वणी शहर व वेकोली अंतर्गत गावांमध्ये शुद्ध पाणीपुरवठा करावा, शहर व गावातील प्रदूषणावर तोडगा काढावा, गावागावात बंद असलेल्या वॉटर फिल्टर प्लांटची चौकशी व्हावी, वणी विधानसभा क्षेत्रातील करोडो रुपये खर्च करून केलेल्या निकृष्ट रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी.

अशा 24 प्रमुख मागण्यांसह ही शेतकरी न्याय यात्रा काढण्यात येत आहे. यामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आशिष खुलसंगे व पदाधिकारी यांनी केले आहे.





