प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

वणी शहरात अनेक समस्या असून समस्यांचे निराकरण होत नाही. त्यामुळे शहरातील समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. याच अनुषंगाने आता संभाजी ब्रिगेड ने समस्या सोडवण्याकरिता पुढाकार घेतला असून समस्या सोडविण्याकरिता निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

साई मंदिर चौक ते नांदेपेरा रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंग पर्यंत रस्त्याची अवस्था अतिशय गंभीर झाली असून मोठमोठे खड्डे पडले आहे. या रस्त्यावर अनेक शैक्षणिक संस्था असल्याने शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा या खड्ड्यात पडून अपघात होऊ शकतो तसेच मोठमोठे वाहने येथून जात असतात. त्यामुळे शाळेतील मुलांना, वृद्ध महिला, पायी जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन व खड्डे वाचवून चालावे लागते. त्यामुळे कधी मोठा अपघात होऊन कोणाचा जीव जाण्याची शक्यता आहे. या गंभीर समस्या कडे लोकप्रतिनिधी प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष आहे.

त्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. येत्या सात दिवसांमध्ये रस्ता दुरुस्तीचे काम न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष जय दोघे व सहकारी उपस्थित होते.






